नवीन नांदेड, दि. ७ (प्रतिनिधी):
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम: इतिहास आणि आजचे संदर्भ’ या विषयाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ७ ते २१ सप्टेंबर या काळात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चारही जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वरील विषयावर शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००० आणि १००० रोख पारितोषिक तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८६०५५९९३३५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, स्पर्धेचे समन्वयक तथा सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. साहेबराव शिंदे यांनी केले आहे.
