नांदेड:
यशवंत महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिर; व्यायाम, सकस आहार व ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन.
नांदेड: जागतिक आरोग्य दिनानिमित्त नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. “सुदृढ शरीर आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन जागतिक सल्लागार मनिषा जायभाये यांनी केले.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी नमूद केले. निरोगी व आनंदी आयुष्य जगण्यासाठी नियमित व्यायामा सोबतच सकस आणि संतुलित आहार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘फिट इंडिया मिशन’ अंतर्गत प्रत्येक कुटुंब निरोगी राहणे आवश्यक असून, त्यातूनच आनंदी समाजाची निर्मिती होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत हा तरुणांचा देश असला तरी तरुणांमध्ये आहार व आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव दिसून येतो. रासायनिक खतांचा वापर करून तयार होणारे अन्न आरोग्यास अपायकारक असल्याने विषमुक्त अन्नाचे सेवन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
लहान मुलांचे आरोग्य, तरुणांवरील वाढता ताण, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न तसेच पुरुषांमधील वाढते स्थूलत्व या समस्यांवर योग्य आहार नियोजन आणि ताणतणाव व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी दररोज किमान एक तास शारीरिक व्यायामासाठी देणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला.
जागतिक आरोग्य सल्लागार मनीषा जायभाये यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राचार्य गणेशचंद्र शिंदे,उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, सौ.राणी सानप, डॉ.भगवान सूर्यवंशी,डॉ.अजय सूर्यवंशी, प्रो.डॉ. शिवराज बोकडे, प्रो. डॉ.अजय गव्हाणे, डॉ.फड मॅडम तसेच कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
