नांदेड:
आज जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, साखरा येथे शाळा प्रवेशोत्सव अत्यंत आनंद, उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक फुग्यांची भव्य कमान उभारण्यात आली होती. तसेच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांसाठी सुंदर सेल्फी पॉइंट व मनमोहक रांगोळीची सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांच्या भव्य स्वागत मिरवणुकीने झाली. पुष्पहार, आकर्षक टोपी आणि हातात गुलाबाचे फूल देऊन चिमुकल्यांना सजविण्यात आले. त्यानंतर सुंदर सजविलेल्या कारच्या ताफ्यातून संपूर्ण गावभर त्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान विविध चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गावातील माता-भगिनींनी ठिकठिकाणी औक्षण करून चिमुकल्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
भव्य मिरवणूक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच मोठ्या वर्गातील विद्यार्थिनींनी पुष्पवृष्टी करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा सेल्फी घेण्यात आला. वर्ग पहिलीचा वर्ग आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे स्मृती म्हणून कागदावर घेऊन त्यांच्या शैक्षणिक जीवनाची मंगल सुरुवात करण्यात आली.
या सोहळ्यास उमरखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. श्री. विजय बेतेवाड साहेब, केंद्रप्रमुख श्री. अरुण बुरकुले सर तसेच श्री. नील पवार सर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. मान्यवरांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्यासोबत संवाद साधला, विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढली तसेच वर्ग पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना मसालेभात व जिलेबीचा स्वादिष्ट बेत देण्यात आला.
या आनंदसोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार वानखेडे, श्रेणी मुख्याध्यापक श्री. भागोराव कांबळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ तसेच महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाचा आधार शाळा आणि शाळेचा अभिमान गाव या उक्तीची प्रचिती देणारा हा शाळा प्रवेशोत्सव सर्वांच्या सहकार्यामुळे अविस्मरणीय ठरला. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानाने हा सोहळा अधिकच संस्मरणीय बनला.
