नांदेड:
नांदेड उत्तर विभागाचे अतिक्रमण पथक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारताच दत्ता कल्याणकर यांनी अतिक्रमणविरोधी धडक कारवाईचा सपाटा लावत शहरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोर चौक ते छत्रपती चौक परिसरातील अंबिका मंगल कार्यालयापर्यंत मुख्य रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून प्रभावी कारवाई केली.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,उपायुक्त सरदार अजितपालसिंघ संधू,सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे यांच्या आदेशानुसार आणि उत्तर विभागाचे पथक प्रमुख दत्ता कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.यावेळी जेसीबीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर व पदपथांवर केलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.कारवाईदरम्यान फेरीवाले,अनधिकृत स्टॉल,रस्त्यावर ठेवण्यात आलेले साहित्य तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यात आला.नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली असून नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या.विशेषतः मोर चौक ते छत्रपती चौक या मुख्य मार्गावरील अतिक्रमणामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली.
दत्ता कल्याणकर यांच्याकडे पथक प्रमुख पदाची जबाबदारी आल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला अधिक गती मिळाली असून शहरातील विविध भागात सातत्याने कारवाई केली जात आहे.सार्वजनिक रस्ते व फुटपाथवर दुकाने अथवा साहित्य ठेवू नये,अन्यथा पुढील काळात कठोर कारवाई केली जाईल,असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.या मोहिमेत शहर वाहतूक शाखा वाजीराबादचे इन्चार्ज एपीआय नागरगोजे,टोईंग वाहनासह पोलीस कर्मचारी घाडगे,ढगे,केंद्रे, आडे तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस बंदोबस्तात ही कारवाई शांततेत पार पडली.
महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे होऊन वाहतुकीला दिलासा मिळाला असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे.आगामी काळातही अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
