नांदेड, दि. २३ : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘असूड मोर्चा’ला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतर अल्पसंख्याक काँग्रेस नांदेड दक्षिण शहराध्यक्ष वाजिद अन्सारी यांनी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
हा मोर्चा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रविंद्र चव्हाण, नांदेड काँग्रेस कमिटी (उत्तर) अध्यक्ष विठ्ठल पावडे, नांदेड काँग्रेस कमिटी (दक्षिण) अध्यक्ष हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना वाजिद अन्सारी म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जनतेत मोठी जागरूकता असून या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. नेत्यांचे सक्षम नेतृत्व आणि शेतकरी बांधवांची एकजूट यामुळे हा मोर्चा यशस्वी झाला. शासनाने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा.”
मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी शेतकरी बांधवांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
