स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘युवा कट्टा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.विविध ज्वलंत विषयांवर विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचार; चारोळ्या व कवितांनी रंगवला कट्टा
नांदेड (प्रतिनिधी) :
भारत लोकसेवा प्रसारक, आकाशवाणी परभणी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या तरफे दी.२२ जुले २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात (सिनेट हॉल) अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात ‘युवा कट्टा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. (संशोधक) विद्यार्थ्यांनी विविध समकालीन विषयांवर आपले मोलाचे विचार मांडले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नीट पेपर लीक प्रकरण, पर्यावरण परिणाम व जीवनदान, विद्यापीठ शिक्षणाचे अनुभव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ,शिक्षणातील बदल, युवकांमधील व्यसनाधीनता, बालविवाह व हुंडा पद्धती, तसेच कृषी धोरण आणि चालू घडामोडी यांसारख्या अत्यंत गंभीर व महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा केली. विशेष म्हणजे, काही होतकरू विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतादरम्यान सुंदर चारोळ्या व कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे या संपूर्ण संवादाचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर व प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन यांच्या प्रेरनेने व प्रत्साहाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सिनेट हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सदानंद कामडी उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध निवेदिका सुमेधा कुलकर्णी, सुषमा कुलकर्णी आणि डॉ. सुहास पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुति गायकवाड यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. या कार्यक्रमामुळे विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमधील बौद्धिक व सुसंवाद कौशल्य प्रभावीपणे अनुभवास मिळाले.