नांदेड:(दि. १३ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा सत्रारंभ व उद्बोधन कार्यक्रमात बोलताना शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील हिंदी विभागाचे डॉ.एम.के. खाजी यांनी वरील प्रतिपादन केले.
विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, हिंदी विभागप्रमुख डॉ. संदीप पाईकराव, डॉ. साईनाथ शाहू, प्रा. मनीषा वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. संदीप पाईकराव यांनी केले. प्रास्ताविकेतून कार्यक्रम आयोजित करण्याचे हेतू व हिंदी विषयाचे महत्त्व आणि हिंदी विभागाच्या वतीने वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाचे परिचय करून देत त्यांनी अशा कार्यक्रमात उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
प्रमुख वक्ते डॉ.एम.के. खाजी म्हणाले की, आजच्या काळात हिंदी ही केवळ साहित्य आणि बोलण्याची भाषा राहिलेली नाही,तर ती डिजिटल युगात जागतिक स्तरावर रोजगाराची मोठी सक्षम माध्यम बनली आहे. तसेच ते पुढे विद्यार्थ्यांना पीपीटीच्या साह्याने हिंदी भाषेचे महत्त्व आणि ‘हिंदी भाषेत रोजगाराच्या संधी’ विषयांवर चर्चा करताना स्पर्धा परीक्षेत आणि इतर क्षेत्रात रोजगार उपलब्धता विषयावर सखोलपणे मार्गदर्शन केले.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, अनुवाद, जाहिरात, सिनेमा, पटकथा लेखन, तसेच कंटेंट रायटिंग, ब्लॉग लेखन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टूल डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये वर्तमान काळात हिंदी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे पटवून दिले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वेगवेगळ्या सुविधा, नियम इंडक्शन कार्यक्रमाची ओळख व्हावी, या हेतूने कार्यक्रम घेण्यात येतो, असे सांगितले. विद्यार्थ्यांना काळानुसार बदलण्याचा आणि भाषा कौशल्य विकसित करण्याचा सल्ला दिला.
यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी धोरणांबाबत ते म्हणाले, यशवंत महाविद्यालय नेहमीच सर्व घटकातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत व्हावे; यासाठी महाविद्यालयातर्फे विविध प्रकारच्या विशेष सुविधा, शिष्यवृत्ती आणि सवलती दिल्या जातात. त्यामुळे पैशाअभावी कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही.
याशिवाय, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील पुस्तके, संशोधन नियतकालिके, ई-जर्नल्स यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. साईनाथ शाहू, डॉ. विद्या सावते, डॉ. मनीषा वाघमारे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन बी.ए.तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. कोमल कागदेवाड यांनी केले आणि शेवटी कु.दिव्या थोंबाळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.
