एम सी आर
Uncategorized

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन — डॉ. शेखर घुंगरवार

नांदेड : ( डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १५ एप्रिल रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे होते. प्रमुख वक्ते वसंतराव नाईक महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे आणि व्याख्यानमाला समन्वयक डॉ. संदीप पाईकराव यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. संदीप पाईकराव यांनी व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करावा, असे आवाहन केले.
प्रमुख वक्ते डॉ. शेखर घुंगरवार यांनी, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार आणि योगदान’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, सखोल आणि प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाच्या बळावर कसा इतिहास घडविला, हे प्रभावीपणे मांडले.
ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना सशक्त करण्याचे कार्य केले. शिक्षण हे स्वातंत्र्याचे शस्त्र आहे, या विचारावर त्यांनी विशेष भर दिला. समाजातील विषमता, अस्पृश्यता आणि अन्याय दूर करण्यासाठी शिक्षणाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्टीकरण दिले.
डॉ. घुंगरवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे विविध पैलू उलगडताना सांगितले की, त्यांनी केवळ उच्च शिक्षण घेतले नाही, तर शिक्षणव्यवस्थेतील बदलांसाठीही प्रयत्न केले. त्यांनी स्त्री शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता व्यापक वाचन, चिंतन आणि अभ्यास करण्याची सवय लावावी, असे त्यांनी सुचविले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी अत्यंत चिंतनशील व मार्गदर्शक विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना शिक्षण, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर विशेष भर दिला. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी केवळ करिअरकडे न पाहता समाजातील प्रश्न समजून घेण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन करताना डॉ. मीरा फड यांनी, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा; हे मानवी उद्धाराचे सर्वोच्च मूल्य असल्याचे प्रतिपादन केले. शेवटी आभार डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.
व्याख्यानास पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने, प्रा.कैलास डाड, डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ.एल. व्ही.पदमारानी राव, स्टाफ सेक्रेटरी डॉ.वनदेव बोरकर यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

Share

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासात नव्हे, विचारांत जगा — डॉ. भारती मढवई

Chief Editor

महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी शिवा कांबळे यांची निवड

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिरा’चा थाटात समारोप

Chief Editor

स्वामी विवेकानंद ‘क्षितिज-2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिर २०२६’चे आयोजन

Chief Editor

चढया दराने खताची विक्री केल्याने* *देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Chief Editor

Leave a Comment