नांदेड:
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समारंभानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गुरुवार, दि.२२ जानेवारी, २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुद्वारा सचखंड हजूर साहिब, नांदेड येथील मुख्य जत्थेदार सिंघ साहेब संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा सचखंड हजूर साहिबचे सहायक जत्थेदार सिंघ साहेब रामसिंघजी, लंगर साहिबचे बाबा बलविंदरसिंघजी तसेच कार्यक्रमाचे यजमान व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालयाचे डेस्क प्रमुख ओएसडी रामेश्वर नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक, ‘हिंद दी चादर ३५० वा शहिदी समारंभ’ क्षेत्रीय समन्वय समितीचे प्रमुख डॉ. विजय सतबीरसिंघजी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
“गुरु तेगबहादूरजी की ३५०वीं शहिदी समारंभ… एक प्रेरणा” या विषयावर आधारित या आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत देश-विदेशातील एकूण २०७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला. यापैकी निरीक्षक समितीने १०० विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली. स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. पहिला गट पाचवी ते बारावी, तर दुसरा गट पदवी ते विद्यावाचस्पती (पीएच.डी.) असा होता.
पहिल्या गटामध्ये प्रथम क्रमांक चरणजीतकौर गिल, द्वितीय क्रमांक अविष वाघमारे आणि तृतीय क्रमांक आर्या दरडे यांनी पटकावला. या गटातील प्रोत्साहनपर पारितोषिके साची कुलकर्णी व युवक वाटोळे यांना प्रदान करण्यात आली. दुसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांक साक्षी बर्गे, द्वितीय क्रमांक किरपाल सिंघ तवाना आणि तृतीय क्रमांक प्राजक्ता वाठोरे यांनी मिळवला. या गटातील प्रोत्साहनपर पारितोषिके जगतारकौर महंत व जीत तोष्णीवाल यांना देण्यात आली.
ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुरभी कन्सल आणि द्वितीय क्रमांक स्मिता स्वामी यांनी मिळवला. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख २५,००० रुपये, द्वितीय पारितोषिक १५,००० रुपये तर तृतीय पारितोषिक १०,००० रुपये असे होते.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी गुरु तेगबहादूरजी यांच्या महान बलिदानाचे महत्त्व, धार्मिक सहिष्णुता, मूल्याधिष्ठित जीवन, देशभक्ती व त्याग यांसारख्या विषयांवर प्रभावी विचार मांडले.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी गुरु तेगबहादूरजी यांच्या महान बलिदानाचे महत्त्व, धार्मिक सहिष्णुता, मूल्याधिष्ठित जीवन, देशभक्ती व त्याग यांसारख्या विषयांवर प्रभावी विचार मांडले. उत्कृष्ट वक्तृत्व सादर करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. गुंजन अग्रवाल व सिमरन प्रेमचंदानी यांनी केले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना व संयोजन डॉ. प्रकाश निहलानी यांनी केले. तसेच समन्वयक म्हणून डॉ. मनोज द. चावळे व डॉ. निवृत्त बराठी सिंघ यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, पालक व नागरिक उपस्थित होते. या वक्तृत्व स्पर्धेमुळे तरुण पिढीमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
———————————
