नांदेड :
आजघडीला महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुण पिढीची जडणघडण स्क्रीनच्या सहवासात झालेली आहे; पण असे असूनही स्क्रिनवर दिसणारे दृश्य समजून घ्यावे तसेच त्यातून सूचित होणाऱ्या अर्थाचे आकलन करून घ्यावे अशी या पिढीची समज तयार होऊ शकलेली नाही. अशावेळी या ‘जेन-झी’ची दृकश्राव्य समज विकसित व्हावी या उद्देशाने यशवंत महाविद्यालयातील वाचन कट्टा ‘अभिरुची फिल्म क्लब’च्या माध्यमातून चित्रपट आस्वादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो.
याचाच एक भाग म्हणून ‘अभिरुची आस्वाद’ या उपक्रमा अंतर्गत सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ हा चित्रपट पदवी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
ज्येष्ठ लेखक दि.बा.मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासि आले’ या प्रसिद्ध कथेवरील हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवातील ‘भेद-अभेद’ प्रकरणावर आधारित आहे.जन्म- मृत्यू,सुख-दुःख अशा प्रश्नांची तात्त्विक चर्चा कथा आणि पटकथेच्याही मध्यवर्ती आहे. परिणामी पदवी प्रथम वर्षाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील कथेचे माध्यमांतर होऊन तयार झालेल्या या चित्रपटाचा आस्वाद एकाच वेळी साहित्य आणि चित्रपट या दोन्ही कलांच्या आस्वादाची अभिरुची घडवतो.हे लक्षात घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांच्या प्रेरणेतून उपक्रमशील व तंत्रस्नेही प्राध्यापक डॉ.विश्वाधार देशमुख यांच्या संकल्पना समन्वयातून पदवी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात आला.
याप्रसंगी अभिरुची फिल्म क्लबच्या नूतन कार्यकारिणीचे अनावरण करण्यात आले; तसेच चित्रपट संपल्यावर त्याच्या विविध अंगांची चर्चाही करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फिल्म क्लबच्या अध्यक्ष राधा कराड, उपाध्यक्ष दुर्गा देशमुख,सचिव ऋषिकेश तेलंग, सहसचिव राजनंदिनी सुरेवाड व विद्या पांचाळ आणि कोषाध्यक्ष प्रीती बरडे यांच्यासह गोदावरी कानशुक्ले, हिंदवी जाधव,मयुर धुतुरे,कृष्णा गव्हाणे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
