(दि. १५ ऑगस्ट २०२६)
शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून गुंतवणूक आहे. राज्याने, समाजाने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च करावा. शिक्षणातूनच सुसंस्कारित, नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय भान असलेला राष्ट्रभक्त माणूस तयार होत असतो. शिक्षणावर खर्च न केल्यास तुरुंगावर करावा लागेल, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यापक विद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत आणि माजी विद्यार्थी गौरव सोहळ्यादरम्यान दि. १४ ऑगस्ट रोजी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या उपाध्यक्ष अँड. मानसीताई हाके, प्रमुख अतिथी संस्थेच्या सचिव प्राचार्य रेखाताई हाके, प्राचार्य डॉ. मीनाक्षी पांडे, डॉ.राहुल वाघमारे, प्राचार्य डॉ. श्रीरंग बोडके, प्राचार्य डॉ.सोपान आंधळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.गव्हाणे म्हणाले की, आज मोबाईलवर बंदी आणण्याची वेळ आलेली आहे, मोबाईलमुळे वाहनांचे वाढते अपघात, सेल्फीमुळे मृत्यू वारंवार घडत आहेत. मोबाईलचा शैक्षणिक, संशोधकीय वापर होण्याऐवजी गैरवापराचे प्रमाण वाढत चालले आहे. मानवी नातेसंबंध उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे.
याप्रसंगी डॉ. राहुल वाघमारे आणि प्राचार्य मीनाक्षी पांडे यांचे यथोचित भाषणे झाली. प्राचार्य रेखाताई हाके यांनी विद्यार्थ्यांच्या अनियमित उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप अँड. मानसीताई हाके यांनी केला.
सूत्रसंचालन प्रा. मेघा सातपुते यांनी केले तर शेवटी आभार डॉ. सोपान आंधळे यांनी मानले. या प्रसंगी अर्पिता रेड्डी, कल्पना खंदारे यांची देखील मनोगते झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी गायकवाड, प्रा. शिंदे, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
