नांदेड, प्रतिनिधी : मालमत्तेच्या वादातून घरासमोरील अंगणात तोडफोड करून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करत गाडीपुरा येथील रहिवासी सुनिता ठाकूर (परिहार) व त्यांचा मुलगा सत्यम ठाकूर यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच इतरवारा पोलीस ठाण्याने गंभीर घटनेची दखल न घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, गाडीपुरा परिसरातील मालमत्तेची नोंदणी व फेरफार नोंद तक्रारदारांच्या नावावर असूनही संबंधित मालमत्तेवरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. यापूर्वीही याबाबत इतरवारा पोलीस ठाण्यात एनसीआर नोंदविण्यात आला होता. तसेच दोन्ही पक्षांना शांतता राखण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली होती.
दरम्यान,१५ जून रोजी दुपारी आरोपींनी काही साथीदारांसह घरासमोर येऊन अंगणातील नव्याने उभारण्यात आलेले बांधकाम व स्टीलचे खांब तोडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी तक्रारदार व त्यांच्या मुलास रोखण्याचा प्रयत्न करताच लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सत्यम ठाकूर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर जखमीला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा एमएलसी अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदारांनी आरोपींविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नासह गंभीर कलमांखाली तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. याशिवाय स्थानिक पोलिसांच्या कथित हलगर्जीपणाची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणीही पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.
