नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचा संघ दिनांक १० ते १४ मार्च दरम्यान Association of Indian Universities (AIU) तर्फे आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठिय राष्ट्रीय युवक महोत्सवात सहभागी होणार आहे. हा महोत्सव सत्यभामा विद्यापीठ, चेन्नई येथे संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाविद्यालयातील स्वाती कंधारे, संदीप कोडापे, रितेश मडावी, पीयूष तोडसाम, गणेश कदम आणि चिन्मय मठपती या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्रता मिळवली आहे. तसेच या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप काळे यांची संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या आंतरराज्यस्तरीय युवक महोत्सवात स्वाती कंधारे हिने क्रिएटिव्ह डान्स, मूक अभिनय आणि विडंबन या तीन स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली. चिन्मय मठपती याने शास्त्रीय सुरवाद्य या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला, तर गणेश कदम याने लोकसंगीत या प्रकारात पारितोषिक पटकावले. तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्र ठरलेल्या लोकनृत्य स्पर्धेत संदीप कोडापे, रितेश मडावी आणि पीयूष तोडसाम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे.
या यशाबद्दल अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, संस्थेच्या सचिव ॲड. वनिताताई जोशी, कोषाध्यक्ष मा. कैलाशचंद काला, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुग्रीव फड, डॉ. एम. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मनीष देशपांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दत्ता बडूरे, एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे, डॉ. मीनाक्षी बांगर, डॉ. संतोष कोटूरवार डॉ. आनंद आष्टूरकर, प्रा. किरण वाघमारे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
