एम सी आर
Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासात नव्हे, विचारांत जगा — डॉ. भारती मढवई

*
नांदेड, दि. २१ फेब्रुवारी २०२६ —
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात ‘यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला’ समितीच्या वतीने दि. २१ फेब्रुवारी रोजी “छत्रपती शिवाजी महाराज: इतिहास नव्हे, प्रेरणादायी विचारधारा” या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. नांदेड येथील हृदयरोगतज्ञ डॉ. भारती मढवई (येवलीकर) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे तसेच व्याख्यानमाला समिती समन्वयक डॉ. संदीप पाईकराव मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे यांनी करून दिला.
ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. भारती मढवई यांनी ठामपणे नमूद केले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ इतिहासाच्या पानांत शोधू नका; त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात उतरवा.” त्यांनी सांगितले की, महाराजांचे जीवन हे केवळ युद्धकौशल्यापुरते मर्यादित नसून ते मूल्याधिष्ठित नेतृत्वाचे आदर्श उदाहरण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैचारिक जडणघडणीचा संदर्भ देताना त्यांनी विशेषत्वाने राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचा उल्लेख केला. महान नेतृत्वामागे समर्थ संस्कार असतात. राजमाता जिजाऊंनी बालशिवबांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न, न्यायाची जाणीव आणि स्वाभिमानाची ठिणगी प्रज्वलित केली, असे त्या म्हणाल्या.
रामायण-महाभारतासारख्या ग्रंथांच्या आदर्श, मूल्य आधारित कथा आणि शौर्यपरंपरेच्या गोष्टींनी त्यांच्या मनात राष्ट्रनिष्ठेची बीजे पेरली, असे त्यांनी स्पष्ट केले.
समानतेच्या विचारांवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात विविध जाती-धर्मातील लोकांना समान सन्मान मिळत असे. “स्वराज्य म्हणजे सर्वांच्या हक्कांचे रक्षण,” असे सांगत त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाबाबतच्या त्यांच्या धोरणांचा उल्लेख केला. शत्रूपक्षातील स्त्रियांनाही आदराने परत पाठवण्याची परंपरा ही त्यांच्या उच्च नैतिकतेची साक्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुढे बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटन कौशल्याबाबत त्या म्हणाल्या, ‘नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे; तर माणसे घडवणे.’ विविध भागांतील मावळ्यांना एकत्र आणून त्यांच्यात निष्ठा, शिस्त आणि ध्येयभावना निर्माण करण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. सामूहिक प्रयत्न, योग्य नियोजन आणि स्थानिक लोकांशी संवाद या आधारावर त्यांनी स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या भाषणादरम्यान संपूर्ण सभागृह एकाग्र झाले होते. अनेक उदाहरणे आणि सुसंगत संदर्भांमुळे वातावरण प्रेरणादायी बनले. ‘इतिहासातून प्रेरणा घ्या, पण वर्तमानात कृती करा,’ हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात ठसला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विज्ञानवादी दृष्टीकोनावर प्रकाश टाकताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रद्धेला बळी पडणारे नव्हते; ते परिस्थितीचे तर्कशुद्ध विश्लेषण करणारे शासक होते. किल्ल्यांची बांधणी, पाण्याचे व्यवस्थापन, आरमार उभारणी आणि गनिमी काव्याची आखणी यामध्ये त्यांची अभ्यासू वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. आजच्या तरुणांनीही तर्क, नियोजन आणि शिस्त यांचा अंगीकार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर नमूद केले की, अशा प्रकारच्या व्याख्यानमालांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला चालना मिळते. त्यांनी डॉ. भारती मढवई यांच्या प्रभावी मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही अशा प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी किरपाल सिंग तवाना यांनी तर आभार बी. कॉम द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. आश्विनी निलेवाड यांनी मानले.
याप्रसंगी व्याख्यानमालेचे सदस्य डॉ. मिरा फड, डॉ. कैलास वडजे, डॉ, साईनाथ शाहू, डॉ. राजरत्न सोनटक्के, डॉ. डी. ए. पुपलवाड, डॉ. संजय जगताप, डॉ. शिवराज बोकडे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ.संजय जगताप, डॉ. संजय ननवरे, डॉ. डी. डी. भोसले, डॉ. सुभाष जुन्ने, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, प्रा. भारती सुवर्णकार आदिसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Related posts

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवात मॉडेल सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

यशवंत ‘द्वारे शोधचक्र पोर्टलवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवात पोस्टर सादरीकरण उत्साहात संपन्न

Chief Editor

नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

Leave a Comment