नांदेड, दि. 4 ऑगस्ट : पंचायत समिती सभागृह, कंधार येथे अति प्रभावित मेघा पाणलोट क्षेत्र संस्थेच्या पुढाकारातून रेशीम शेती विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे होते.
कार्यक्रमात जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, मेघा पाणलोट प्रकल्पाचे समन्वयक दिनेश खडसे, एसबीआय आरसेटीचे आशिष राऊत, अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके तसेच मनरेगाचे सर्व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.
अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करून स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी सांगितले की, पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम शेती अधिक फायदेशीर असून त्यामध्ये वारंवार लागवडीचा खर्च करावा लागत नाही. कमी अथवा अधिक पाऊस पडला तरी या शेतीवर त्याचा तुलनेने कमी परिणाम होतो. सध्या रेशीम कोषाला प्रतिक्विंटल सुमारे ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
रेशीम शेतीमुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. अळ्यांनी खाऊन उरलेला तुतीचा पाला हा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयुक्त ठरतो. तसेच या व्यवसायात पती-पत्नी दोघांचाही सहभाग असल्याने कुटुंबातील समन्वय वाढतो आणि वाढीव उत्पन्नामुळे समाजात आर्थिक विश्वासार्हताही निर्माण होते. त्यामुळे “शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती” प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश खडसे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे, लोभाजी मुळे, सतीश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000
