नांदेड: प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता तथा व्याख्याते तानाजी हुस्सेकर यांनी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या मानवतावादी विचारांवर तसेच त्यांच्या सामाजिक समता, अहिंसा आणि मानवकल्याणाच्या कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, उपकुलसचिव रामदास पेद्देवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम तसेच कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना तानाजी हुस्सेकर म्हणाले की, भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांनी समाजातील जातिभेद, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता आदी अनिष्ट प्रथांना विरोध करून मानवतेवर आधारित विचारांचा प्रसार केला. महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानून त्यांनी धर्म, समाज आणि अध्यात्माच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. स्त्री-पुरुष समानता, अहिंसा, दया, सदाचार, सत्य आणि सामाजिक समरसतेचा संदेश त्यांनी समाजाला दिला.
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या शिकवणीतून माणसाने विवेक, सदाचार आणि मानवकल्याणाचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश मिळतो. त्यांचे जीवनकार्य हे मानवता, समानता आणि ज्ञानाचा दीपस्तंभ असून, आजच्या काळातही त्यांचे विचार समाजासाठी दिशादर्शक आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच अवतार दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्य व शिकवणीवर आधारित प्रबोधनपर माहितीचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी केले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————
