नांदेड:
“तळागाळातील लोकांची भावना स्पष्ट आहे की, आरक्षणाचे वर्गीकरण झालेच पाहिजे आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही राज्यभर फिरतो, समाजातील कष्टकरी माणसांचे जीवन जवळून पाहतो. काच-कागद-पत्र जमा करून, मधमाश्यांचे मोहळ काढून किंवा रानावनात दिवसभर घाम गाळून जगणारी माणसं आमच्या समाजात आहेत. एवढा संघर्ष करूनही कोणापुढे न झुकणारी आणि स्वाभिमानाने जगणारी ही माणसं आहेत. त्यांची परिस्थिती पाहून मनाला प्रचंड वेदना होतात.”
“देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली, मात्र तळागाळातील वंचित समाजाला खऱ्या अर्थाने समान संधी आणि विकासाचे स्वातंत्र्य कधी मिळणार, हा प्रश्न आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून कष्टकरी आणि उपेक्षित माणसाच्या जगण्याचा आवाज मांडला. ‘आपण तर माणसं आहोत माणसं’ ही जाणीव समाजाच्या मनामध्ये रुजली पाहिजे. आमच्या माणसांचे जीवन कधी बदलणार, हा प्रश्न आता शासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे.”
“भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, समानता आणि समान संधी देण्याची भूमिका घेतली आहे. संविधान कोणाच्याही वैयक्तिक मालकीचे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते देशाला अर्पण केले आहे. आरक्षणाच्या लाभापासून तळागाळातील उपेक्षित घटक वंचित राहू नयेत, यासाठी वर्गीकरणाचा प्रश्न गांभीर्याने सोडवणे आवश्यक आहे.”
“देशाच्या उभारणीत मांग समाजासह आमच्या पूर्वजांचे मोठे योगदान आहे. देशपिता लहुजी साळवे आणि महानायक फकीरा यांच्या संघर्षाचा वारसा घेऊन आम्ही आज एकत्र आलो आहोत. हा लढा कोणाच्या विरोधात नाही. समान संधी आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे वर्गीकरणाच्या मागणीवर शासनाने सकारात्मक आणि तातडीने निर्णय घ्यावा.”
— सचिन साठे.
