दिनांक:(३ ऑगस्ट २०२६)
युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावा. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुदृढ, सजग आणि व्यसनमुक्त युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून नशामुक्त युवा: विकसित भारत अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री. डी.पी.सावंत यांनी अध्यक्षीय समारोपात केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त युवा – विकसित भारत अभियान’ अंतर्गत जिल्हा युवा अधिकारी कार्यालय आणि ‘यशवंत ‘ मधील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धां उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटक अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी, युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले तसेच शासनाच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे नमूद केले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, राष्ट्रीय सेवा योजना, माय भारत आणि युवक विकासाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते. युवकांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी जनजागृतीचे कार्य सातत्याने करावे, अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी समाजसेवक श्री. कैलास गायकवाड उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी शु. श्री. अशनी कानकटे यांनी, माय भारत उपक्रमाची उद्दिष्टे, नशामुक्त युवा – विकसित भारत अभियानाची संकल्पना तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट केले. युवकांमध्ये सर्जनशीलता, जाणीव आणि जागृती वाढविण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
उद्घाटन समारंभानंतर दोन सत्रांमध्ये विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संगीत, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व/वादविवाद, घोषवाक्य लेखन, रील व लघुपट निर्मिती, पथनाट्य आणि स्लॅम पोएट्री या आठ स्पर्धांचा समावेश होता. नांदेड जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रत्येक स्पर्धेत व्यसनमुक्ती, युवक सक्षमीकरण आणि विकसित भारत या संकल्पनांवर आधारित प्रभावी संदेश देण्यात आला.
स्पर्धेनंतर बक्षीस वितरण व समारोप समारंभ पार पडला. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. रत्नमाला म्हस्के, प्रा. अभिनंदन इंगोले आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.
