नांदेड: दिनांक १ ऑगस्ट २०२६
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव–२०२६’ ला आज, शनिवार (दि. १ ऑगस्ट) उत्साहात प्रारंभ झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्ष येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनी अंबिका सांगळे आणि प्राची जोंधळे यांच्या हस्ते सर्वप्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, गणितीयशास्त्रे संकुलाच्या संचालिका डॉ. रुपाली जैन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. राजेंद्र गोनारकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहायक कुलसचिव रामदास पेद्देवाड, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, संतोष चव्हाण यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व अभ्यास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक, साहित्यिक व प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवानिमित्त शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी विशेष व्याख्यान होणार असून त्यामध्ये कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध वक्ते डॉ. शरद गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी डॉ. आदिनाथ इंगोले राहणार आहेत. डॉ. वैजनाथ अनमुलवाड आणि सुप्रसिद्ध कवी डॉ. मारोती कसाब हे प्रमुख उपस्थित राहून आपल्या कविता सादर करणार आहेत. याशिवाय विद्यापीठातील इच्छुक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थीही या कवी संमेलनात सहभागी होणार आहेत.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी प्रबोधनपर शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला असून तुषार सूर्यवंशी व संच, मुंबई यांचे शाहिरी सादरीकरण होणार आहे. या शाहिरी जलशातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा, लोकशाही मूल्यांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाचा जागर करण्यात येणार आहे.
याप्रसंगी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी महोत्सवांतर्गत आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
——————-
