प्रतिनिधी: (दिनांक 28 जुलै 2016 मंगळवार)
लोकशाही व्यवस्थेला यशस्वी आणि सक्षम बनविण्यासाठी कार्यक्षम, जबाबदार व दूरदृष्टी असलेले प्रशासक घडणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला प्रशासक कसा असावा हे लोकप्रशासन शिकवते.शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे प्रशासन असून, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख दृष्टीकोन यांचा विकास लोकप्रशासनाच्या अभ्यासातून होतो. विद्यार्थी जीवनात घेतलेली मेहनतच भविष्यात अधिकारी म्हणून कार्य करताना उपयोगी पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने परिश्रम घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड येथील लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. दीपक वाघमारे यांनी केले.

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील लोकप्रशासन विभागामार्फत आयोजित सत्रारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे उपस्थित होते.

प्रास्ताविकात लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. मीरा फड यांनी सत्रारंभ कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. दीपक वाघमारे तसेच प्रा. श्रीकांत केंद्रे यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. दीपक वाघमारे यांनी लोकप्रशासन विषयामुळे विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध होणाऱ्या विविध करिअर संधींचा सविस्तर ऊहापोह केला. सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे आवश्यक असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी यशवंत महाविद्यालय हे मराठवाड्यातील अग्रगण्य व नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असल्याचे सांगितले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध शैक्षणिक सुविधा, योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मराठवाड्यातील एकमेव सर्वात मोठे डिजिटल ग्रंथालय हे यशवंत महाविद्यालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. आर.पी.गावंडे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयीन प्रमुख संदीप पाटील, बिराजदार, गजानन पाटील तसेच प्रसिद्धी प्रमुख डॉ. अजय गव्हाणे यांनी विशेष सहकार्य केले.
