नांदेड एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयांमध्ये लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
नांदेड, दि. १ ऑगस्ट : साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एम. जी. पत्रकारिता महाविद्यालय, नांदेड येथे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी बोलताना म्हणाले की डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लावण्या, पोवाडे, चित्रपट लेखन आदी साहित्यप्रकारांतून कामगार, कष्टकरी, दलित, शोषित आणि वंचित समाजाच्या जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. त्यांच्या साहित्यामुळे समाजात समता, न्याय आणि परिवर्तनाची प्रेरणा निर्माण झाली आहे.आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांतून लेखनाची प्रेरणा घ्यावी.”
यावेळी विद्यार्थ्यांसाठी लेखन प्रेरणा उपक्रम, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावरील माहिती, साहित्य प्रदर्शन तसेच लेखन संस्कृतीला चालना देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लेखनाचा संकल्प केला.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लेखन प्रेरणा दिना’चा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे, विचारशक्ती विकसित करणे आणि सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन देणे हा असल्याचेही प्राचार्य डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास डॉ. प्रवीण सेलूकर,डॉ.भगवान सूर्यवंशी, प्रा.राज गायकवाड, कु.दिशा कांबळे,संजय साळवे यांच्या सह कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
