कुलगुरूंशी संवाद’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी मांडल्या विविध समस्या; जागेवरच मार्गदर्शन व उपाययोजनांचे आश्वासन
नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्यार्थी विकास कक्ष समितीच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘कुलगुरूंशी संवाद’ (Dialogue with the Vice-Chancellor) या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी बैठक विद्यापीठाच्या प्रशासकीय मुख्य इमारतीत गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठातील विविध शैक्षणिक संकुलांमधील विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध अडचणी, समस्या आणि अपेक्षा कुलगुरूंसमोर थेट मांडल्या. यामध्ये शैक्षणिक बाबी, वसतिगृहातील सुविधा, आरोग्यविषयक सेवा, सामाजिक व आर्थिक अडचणी, अभ्यासक्रम तसेच अभ्यासक्रमेतर उपक्रमांशी संबंधित विविध प्रश्नांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांचे कुलगुरू डॉ. मनोहर जी. चासकर यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. अनेक प्रश्नांवर त्यांनी विद्यार्थ्यांना जागेवरच मार्गदर्शन केले, तर संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक व मूलभूत सुविधांसोबतच शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर जी. चासकर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा, शैक्षणिक गरजा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत विद्यापीठ प्रशासन कुठेही कमी पडणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडाव्यात आणि विद्यापीठ प्रशासनाने त्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून तत्परतेने कार्यवाही करावी.”
विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे थेट, मुक्त आणि सुसंवादी संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर योग्य त्या पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जागेवरच प्रश्नांची उत्तरे आणि मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांचा विद्यापीठ प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विविध शैक्षणिक संकुलांतील विद्यार्थी प्रतिनिधींना या संवादासाठी सहभागी करून घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या समस्या थेट विद्यापीठाच्या सर्वोच्च प्रशासकीय स्तरापर्यंत पोहोचवून त्यांचे प्रभावी निराकरण करणे, तसेच विद्यार्थी व विद्यापीठ प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विविध विभागांचे विभागप्रमुख, संचालक, प्राध्यापक, अधिकारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक भूमिका व तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व समाधानकारक ठरला.
—————–
