प्रतिनिधी : राज्यभरात आज वटसावित्री पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्री व्रताचे विधीवत पालन केले. वडाच्या झाडाला पवित्र दोरा गुंडाळत पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, कुटुंबातील सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
शहरांसह ग्रामीण भागातील मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सावित्री-सत्यवानाच्या कथेचे श्रवण, आरती आणि सामूहिक पूजन करण्यात आले. अनेक महिलांनी उपवास करून पारंपरिक पद्धतीने व्रत पूर्ण केले.
अनेक ठिकाणी महिला मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या वतीने वटसावित्री निमित्त धार्मिक, सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी वृक्षसंवर्धनाचा संदेश देत वडाच्या रोपांचे वाटपही करण्यात आले.
हिंदू संस्कृतीत वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व असून, सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, श्रद्धा आणि बुद्धिमत्तेच्या बळावर यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याची पौराणिक कथा या व्रतामागे सांगितली जाते. त्यामुळे हे व्रत पती-पत्नीतील विश्वास, समर्पण आणि कौटुंबिक मूल्यांचे प्रतीक मानले जाते.
राज्यभरात वटसावित्री पौर्णिमा धार्मिक उत्साह, भक्तिमय वातावरण आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत शांततेत आणि उत्साहात साजरी झाली.
