प्रतिनिधी:
मौजे. दरेगाव येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 152 वी जयंती साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रा.डॉ. मारोती गायकवाड, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या जीवन व कार्य यावर आधारित व्याख्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्मशानभूमीत वृक्षरोपण करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व वटवृक्षाचे रोपण मा. बालाजी उमाटे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती देगलूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरुवातीस स्मशानभूमीत वड ,पिंपळ, चिंच आणि करंजी अशा 80 वृक्षाची स्मशानभूमीत लागवड करण्यात आली. यानंतर दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महापुरुषांच्या विचाराची पुस्तके देऊन बहुजनवादी साहित्यिक प्रोफेसर डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे आणि मच्छिंद्र गवाले, राज्याध्यक्ष, मानवी हक्क अभियान यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेले शिक्षण आणि आरक्षणासाठी त्यांचे योगदान सांगितले. शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या राज्यात शोषित, वंचित, पीडित आणि व्यवस्थेने ठरवलेले गुन्हेगारांना म्हणजेच (पारधी, मांग,वडार) अशा समाजातील लोकांना न्याय देऊन त्यांच्या जीवनाचा कायापालट केला. राजा म्हणून वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने या मनुवादी व्यवस्था संपली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शाहू महाराजांनी आपल्या करवीर नगरीत कला,क्रीडा आणि. शिक्षणातून मानवी मूल्याचे जतन करण्याचे कार्य केले. राजवाड्यातून बाहेर पडून मांग महार वाड्यात जाऊन त्यांच्या जीवनाचे सोने करणारा हा लोकराजा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच बहुजन अस्पृश्यांचे उद्धारक आहेत हेच तुमचे नेते आहेत असे शाहू महाराजांचे उदगार म्हणजे बाबासाहेबांचे महानत्व शाहू महाराजांनी अधोरेखित केले आहे. असे सांगून बहुजन आणि अस्पृश्य समाजाला दिशा देण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे. त्यांच्या विचार व कार्याचा वसा आपल्यासारख्या खेड्यातील मारुती गायकवाड सारख्या व्यक्तींनी समाज व राष्ट्र उद्धाराचे कार्य करून पुढे नेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. असे व्यक्त केले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र गवाले साहेब यांनी अध्यक्षीय समारोपात त्यांनी आजची सामाजिक परिस्थिती आणि शाहू महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे असे सांगून आज बहुजन समाज सुद्धा महापुरुषांचे नाव घेतो परंतु जाती जातीत विभागल्या जाऊन तो आपल्या विनाशाला बळी पडत आहे, असे मत प्रतिपादन केले. आज अ, ब, क, ड वर्गीकरणाच्या निमित्ताने व्यवस्थेने ठरवलेले शूद्र (मांग, महार चांभार आणि ढोर)बहुजन समाज सुद्धा आपापसात एकमेकांच्या समोर उभे आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. शाहू महाराज यांनी शिक्षण आणि आरक्षणाचे धोरण घोड्याच्या उदाहरणातून घालून दिले होते. त्याच राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून हा समाज निर्माण झाला पाहिजे आणि बहुजन समाजाची लोक एकत्रित आली पाहिजे असे परखड मत अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मारुती गायकवाड यांनी करताना आज ही शाहू महाराजांची जयंती घेण्याचा उद्देश त्यांनी गावकऱ्यांसमोर ठेवला. आज शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. अजून पेरणी झाली नाही.झाडे तोडली जात आहे. त्यामुळे पाऊस पडत नाही. झाडे तोडण्यापेक्षा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक गावातल्या नागरिकांनी “एक तरी झाड लावा आणि झाड जगवा” तरच भविष्यकाळात आपले जीवन सुखी होणार आहे असा मूलमंत्र दिले. समाजातील गुणवंत विद्यार्थी जे शिक्षण घेणारे आहेत त्यांच्या पाठीवर कोणीतरी शाब्बासकीची थाप देऊन त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. वाढदिवसाच्या निमित्ताने स्मशानभूमी दत्तक घेऊन झाडे लावून स्मशानभूमी विकसित करून अंधश्रद्धेला मूठमाती दिली पाहिजे, असा नाविन्यपूर्ण उपक्रम राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली आहे.
या कार्यक्रमाची सूत्रसंचालन संपत गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित गावकरी सरपंच चंद्रकांत गजलवार, संजय सूर्यवंशी (ग्रामसेवक),बालाजी पाटील, प्रा. रमेश मारकवाड, हनमंत बनसोडे, पंढरीनाथ मारकवाड, विठ्ठल गड्डपवार, विनायक वाघडोळे, हनुमंत गायकवाड संग्राम गजलवार, शिवाजी मारकवाड, गौतम सोनकांबळे उपस्थित होते. राजर्षी शाहू जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी पंढरीनाथ गायकवाड, विलास गायकवाड, रावण गायकवाड, विवेक गायकवाड यांनी प्रयत्न करून शाहू महाराजांची जयंती साजरी करून गावकरी आणि बहुजन समाजासमोर लोकराजांचे कार्य जपण्याचे काम केले आहे.
