नांदेड | प्रतिनिधी
शहरातील देगलूर नाका परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. मुजाहिद खान यांनी केली आहे.
मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज (वय १०), मोहम्मद अली मोहम्मद इद्रिस (वय १३), सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय १३) आणि आयान इब्राहिम बागवान (वय ११) हे चार मित्र खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. हारूनबाग परिसरातील खोदलेल्या खोल खड्ड्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात प्रवेश केला. मात्र खड्ड्यातील गाळ व पाण्याची खोली लक्षात न आल्याने चारही मुले पाण्यात बुडाली.
महानगरपालिकेमार्फत खासगी कंत्राटदाराकडून सुरू असलेल्या नाल्याच्या कामामुळे सुमारे १० ते १५ फूट खोल खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था, संरक्षणात्मक कुंपण किंवा इशारा फलक नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा न करता प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी डॉ. मुजाहिद खान यांनी केली आहे.
