इस्लापूर:डॉ.भगवान सूर्यवंशी.
किनवट तालुक्यातील सुप्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित ४३ कोटी रुपयांच्या आराखड्याची आज (दि. १९ फेब्रुवारी) प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे उपसचिव राजेंद्र खंदारे यांनी स्थळभेट देऊन भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मोजमापणी व प्रशासकीय प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या या विकास आराखड्याचा उद्देश पर्यटनाला चालना देणे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या महसुलात वाढ करणे हा आहे.
प्रस्तावित विकासकामे
या आराखड्यात सुशोभित उद्यान, पर्यटकांसाठी रेस्ट हाऊस, धबधबा अनुभवण्यासाठी एमपी थिएटर, लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, रोजगारनिर्मितीसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाण्याची टाकी, डेकोरेटिव्ह पोल, विस्तृत पार्किंग व्यवस्था, सौरऊर्जा प्रकल्प तसेच मंदिर ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रुंद रस्ता आदी कामांचा समावेश आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आमदार भीमराव केराम यांनी सहमती दर्शवून पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, पैनगंगा नदीवरील परोटी तांडा येथे मृद व जलसंधारण विभागामार्फत बंधारा उभारण्यात येणार असून, त्याचे बॅकवॉटर सहस्रकुंडपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे नदी वर्षभर जलयुक्त राहण्यास मदत होणार असून भविष्यात बोटिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
सदर विकासकामांसाठी महसुली जागेवर स्वतंत्र गट क्रमांक निर्माण करून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पाहणीवेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. पी. झरीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, सहस्रकुंड बाणगंगा ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर, मंडळ अधिकारी सचिन भालेराव, वनपाल व्ही एस गुद्दे वनरक्षक अकबर सय्यद, कृष्णा राठोड, तलाठी जाधव, भूमी अभिलेख अधिकारी मुनेश्वर, प्रकल्प सल्लागार इंजि.दीपक मुळे उपस्थित होते.
या विकास आराखड्यामुळे सहस्रकुंड पर्यटन स्थळाचा कायापालट होऊन परिसरातील आर्थिक व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
