वसंतराव नाईक महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात संपन्न…. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने समतेचे पुरस्कर्ते* – डॉ.अजय गव्हाने
नवीन नांदेड, (प्रतिनिधी)-स्त्री- पुरुष समानता, बंधुता आणि न्याय या चिरंतन मूल्यांची पेरणी करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शेतकरी, कष्टकरी वंचितांच्या व उपेक्षितांच्या जीवनातील अंधकार नष्ट करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वैचारिक क्रांतीचे जनक आणि सर्वार्थाने समता तत्वाचे पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत, यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ.अजय गव्हाणे यांनी केले. वसंतराव नाईक महाविद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह घेण्यात आला. या शब्दाच्या समारोप कार्यक्रमात प्रो. डॉ. अजय गव्हाणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी होते.
प्रो. डॉ. अजय गव्हाणे याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील वंचितांची आणि स्त्रीयांची धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे मानले. त्यांनी भारतीय संविधानातून समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी मानवी मूल्यांची जपणूक केली. एकोणीसाव्या शतकात प्रतिगामी विचाराला दूर सारून एक मानवतावादी विचारधारा या महाराष्ट्रातील जनमानसात आपल्या कृतीतून आणि लेखनातून रूजविली.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील कालबाह्य झालेल्या प्रथा परंपरांना तिलांजली दिली. भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा नवा आदर्श घालून दिला. सर्वांना दर्जाची आणि संधीची समानता मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले कार्य अवर्णनीय आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.सतिश शेटे यांनी करून दिला तर प्रो.डॉ.नागेश कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात दि.७/४/२०२६ ते १४/०४/२०२६ या काळात सामाजिक समता सप्ताह उत्साहात संपन्न झाला.दि.०७/४/२०२५ रोजी डॉ.भारत कचरे यांच्या उपस्थितीत सप्ताहाचे उद्घाटन झाले. ‘महाड चवदार तळे सत्याग्रह विचार’ या विषयाच्या अनुषंगाने डॉ. राजेंद्र गोणारकर यांचे मार्गदर्शन लाभले, शाहीर रमेश गिरी यांच्या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजनही या सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात आले होते, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याजयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त डॉ.महेश माळी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या काळात रक्तदान शिबिर आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा सामाजिक समता सप्ताह उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. सप्ताहातील विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रो. डॉ. रेणुका मोरे,डॉ.दिलिप पालिमकर, डॉ. सुनीता गरुड, डॉ.आर.एम. कागणे, डॉ.अनिल गच्चे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ. विजयकुमार मोरे, डॉ. गणेश लिंगमपल्ले, डॉ. संतोष शिंदे, डॉ. उत्तम कानवटे, डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. संजय गिरे, प्रा. कविता हंबर्डे, प्रा. किशोर सुर्यवाड, प्रा. प्रबुद्ध चित्ते, प्रा. कपिल हिंगोले, प्रा. नितीन मुंडलोड, डॉ. राहुल सरोदे यांसह शिक्षकेतर कर्मचारी यांसह महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
