गडचिरोली,प्रतिनिधी :-
आज दिनांक 08 ऑगस्ट, 2022 रोजी भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासाकरीता गडचिरोली जिल्हयामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. तर दिनांक 10 ऑगस्ट, 2022 करीता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
दिनांक 07 ऑगस्ट, 2022 पासुन वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व गडचिरोली जिल्ह्यासह नजीकच्या जिल्हयामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, अप्पर वर्धा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज यांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत असुन अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हयात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांकाठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट, तसेच वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता संबंधीत तहसिलदार यांनी संभाव्य पूरबाधीत भागात वेळोवेळी दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी.
नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.