आरपार’ आत्मकथन अनुभवलेले दुःख अन् वेदनेचा हुंकार कमल कदम यांच्या मुलाखतीतून उलगडला जीवन प्रवास
नांदेड : जीवन जगतानाचा संपूर्ण प्रवास दुःख, वेदना आणि संघर्षमय क्लेशदायक होता. भोगलेले दुःख, यातना यांना वाट मोकळी करावी यासाठी ‘ आरपार ‘ हे आत्मकथन शब्दबद्ध झाल्याची भावना ‘ आरपार ‘ आत्मकथनाच्या लेखिका कमल कदम यांनी व्यक्त केली.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूर यांच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी ‘संवाद पुस्तकाशी अन् गप्पा लेखकांशी ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास भोसले, जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश जोशी, उज्ज्वला पडलवार, ड्रीम फिटनेसच्या संचालिका रेणुका गुप्ता यांची उपस्थिती होती.
‘आरपार ‘ आत्मकथनाच्या लेखिका कमल कदम यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी लेखिका कमल कदम यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास मुलाखतीतून पुढे आला. अनेक कठीण परिस्थितीत मी शांत आणि संयमी राहिले. त्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकले. आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी सोबत असल्याने मला दुख आणि वेदनेवर मात करता आली. जीवनानुभव कथन करताना श्रोत्यांचे डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा शंकुतलाबाई सूर्यवंशी, डॉ. राम वाघमारे, प्राचार्य डॉ. माधव बसवंते, साहित्यिक शिवा कांबळे, डॉ. प्रवीण सेलुकर, प्रशांत कऱ्हाळे, प्रा. विजया दाढेल, सुवर्णा वाघमारे, माधव मोरे यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी केले.