नांदेड:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?, कोण होते कॉ. गोविंद पानसरे?, कोण होते एम. एम. कलबुर्गी? व कोण होत्या गौरी लंकेश? या पुस्तिकांचे लोकार्पण कवियत्री सारिका उबाळे यांच्या हस्ते, SPC Classes श्याम नगर येथे करण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक अंधुकशी रेषा असते. ती रेषा तर्क, अनुभव व निरीक्षण द्वारे ओळखता आली पाहिजे.
गेल्या काही वर्षापासून देशातील अहिष्णुतेचं प्रमाण वाढलेलं आहे. विचाराचा प्रतिवाद विचाराने करू शकत नसणारे लोक हिंसेचा मार्ग अवलंबत असतात. अशाच प्रवर्तिनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केली आहे. प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींना, ज्याची आपण हत्या करतोय ते कोण होते याची पूर्णतः माहिती असण्याची शक्यता नसणार. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सामान्य लोकांना या विचारवंतांची ओळख व्हावी या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकल्प हाती घेतला. अनिल चव्हाण लिखित या पुस्तिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अंनिस केला आहे.
20 ऑगस्ट हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन. विज्ञान व त्याचा प्रचार प्रसार यासाठी वाहून घेतलेल्या भारतातील 40 पेक्षा अधिक नामांकित संघटनांच संघटन असलेल्या “ऑल इंडिया पब्लिक सायन्स नेटवर्क” या संस्थेने हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून भारतभर साजरा करण्याचं जाहीर केलं. त्याचाच एक भाग म्हणून वरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयाची मांडणी व प्रास्ताविक अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य सम्राट हटकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साई किरण सलगरे यांनी यांनी केले तर अंनिसचे कार्याध्यक्ष भगवान चंद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास भगवान पवार, नागराज आदी कार्यकर्ते तसेच 125 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
