नांदेड : धर्म, भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा एक प्रेरणादायी प्रसंग नांदेडमध्ये पाहायला मिळाला.
सुमारे दोन वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील फातिमा ताईंची त्यावेळचे खासदार तथा लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्याशी भेट झाली होती. या भेटीदरम्यान भगवद्गीतेचे उर्दू भाषेत लेखन करण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेतून प्रेरणा घेत फातिमा ताईंनी भगवद्गीतेचे उर्दूमधून लेखन पूर्ण केले.
लेखन पूर्ण झाल्यानंतर फातिमा ताईंनी भगवद्गीतेची उर्दू आवृत्ती लोकनेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना सस्नेह भेट दिली. या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत फातिमा ताईंचे अभिनंदन केले.
या प्रसंगी शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रवक्ते तथा अनुदानित वसतिगृह संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मरक्षक वीर सुशीलकुमार चव्हाण, डॉ. भगवान सूर्यवंशी, सुरेश जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
भगवद्गीतेतील ज्ञान, कर्म, कर्तव्य आणि मानवतेचा संदेश कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. उर्दू भाषेत भगवद्गीतेचे लेखन करून हा संदेश अधिक व्यापक समाजापर्यंत पोहोचवण्याचा फातिमा ताईंचा प्रयत्न हा सामाजिक सलोखा, सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर संदेश देणारा आहे.फातिमा ताईंच्या या अनोख्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, नांदेडच्या सामाजिक ऐक्याची ही एक प्रेरणादायी ओळख ठरली आहे.
