नांदेड :प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ – २०२६ यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत आयोजित या समारंभात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या इंग्रजी भाषा सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष मा. श्री उदयरावजी निंबाळकर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य श्री नरेंद्र दादा चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरीशचंद्र पतंगे तसेच परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. विजय भोसले यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात शैक्षणिक मिरवणुकीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन तथा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गीत सादर करून वातावरणात शिस्त व प्रेरणा निर्माण केली.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले. पदवी वितरण समारंभ हा केवळ प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबतच चारित्र्य, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. विजय भोसले यांनी परीक्षा विभागाचा सविस्तर अहवाल सादर केला. विद्यापीठाच्या नियमांनुसार परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याचे त्यांनी सांगितले. विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थी, सुवर्णपदक विजेते व विद्यापीठ क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे श्री नरेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजचे जग वेगाने बदलत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संधींमुळे रोजगाराचे स्वरूपही बदलत आहे. विद्यार्थ्यांनी काळानुरूप नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवावे. “विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनावे,” असा मौलिक संदेश त्यांनी दिला. नव्या पिढीने नाविन्यपूर्ण विचार, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित करावा, असेही त्यांनी नमूद केले.


अध्यक्षीय भाषणात मा. श्री उदयरावजी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, सातत्य आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. यशस्वी जीवनासाठी शिक्षणासोबतच शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी विभागातील प्रा डॉ शिवाजी सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन केले तर अर्थशास्त्र विभागातील डॉ दिगंबर भोसले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यानंतर मान्यवर, शिक्षक व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे सामूहिक छायाचित्र घेण्यात आले. या कार्यक्रमास यशवंत महाविद्यालयाचे प्रबंधक श्री संदीप पाटील, डॉ सौ पद्माराणी राव ,डॉ एस एस ननवरे, डॉ सौ मीरा फड, डॉ वीरभद्र स्वामी डॉ संजय जगताप, डॉ संदीप खानसोळे डॉ सुभाष जुने डॉ सौ मस्के मॅडम, डॉ संतोष राऊत डॉ शिवराज शिंदे,डॉ सौ संगीता चाटी, प्रा भारती सुवर्णकार, श्री गोविंद शिंदे, विठ्ठल इंगोले, श्री बतलवाड, श्री जगन्नाथ महामुनी, श्री सुरनर श्री इंगोले श्री जगदीश उमरीकर आदी उपस्थित होते.
