*
नांदेड:( दि. १३ फेब्रुवारी २०२६)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या यशवंत महाविद्यालयात ‘दिव्यांगांकरिता विविध कायदे आणि संधी’ या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे नियोजन व मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आले. हे व्याख्यान वाणिज्य विभागातील आयसीटी कक्षात अंतर्गत समिती व समान संधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे होते. प्रमुख वक्ते पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राध्यापक तथा एस.आर.टी.एम.यू.एन. चे अधिविद्या परिषद सदस्य व बीओएस अध्यक्ष डॉ. डी. एस. यादव सर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. यादव यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या कायद्यांतील ऐतिहासिक बदल स्पष्ट करताना १९९५ चा कायदा कल्याणकारी दृष्टिकोनावर आधारित होता, तर २०१६ चा कायदा हा हक्क, सन्मान आणि समानतेच्या तत्त्वांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगता ही दया नव्हे, तर अधिकारांचा विषय आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
२०१६ च्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रकारांची संख्या ७ वरून २१ पर्यंत वाढविण्यात आली असून ऑटिझम, विशिष्ट शिकण्याच्या अडचणी, अॅसिड हल्ला पीडित, पार्किन्सन आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस आदींचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले तसेच ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व प्रमाणित झालेल्या व्यक्तींना बेंचमार्क डिसॅबिलिटी अंतर्गत शिक्षण व नोकरीत आरक्षण, शिष्यवृत्ती व इतर शासकीय लाभ मिळतात, अशी माहिती दिली.
सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ३% वरून ४% करण्यात आल्याचे सांगताना खासगी क्षेत्रालाही दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रात १८ वर्षांपर्यंत मोफत शिक्षण, उच्च शिक्षणात ४% आरक्षण, तसेच सर्व शाळांमध्ये समावेशक शिक्षण बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक इमारती, वाहतूक व्यवस्था व डिजिटल सेवा दिव्यांगांसाठी सुलभ असणे कायद्याने अनिवार्य करण्यात आले आहे. रॅम्प, लिफ्ट, स्पर्श मार्ग यांसारख्या सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर निर्णयक्षम व्यक्ती म्हणून मान्यता देण्यात आली असून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर दंडात्मक तरतुदी असल्याची माहिती दिली.
आपल्या समारोपात डॉ. यादव म्हणाले की, समावेशक समाज निर्माण करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून ती न्यायाची आणि मानवतेची गरज आहे. अडथळे दूर झाले की क्षमता उजळून निघते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. संभाजी वर्ताळे यांनी केले. मान्यवरांचे परिचय डॉ. योगेश नकाते यांनी केले अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी केला. शेवटी आभार समन्वयक प्रा. संदीप राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ. ज्ञानेश्वर पुपुलवाड, डॉ. अनिल कुंवर यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. संकेत देलमाडे, डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा. भारती सुवर्णकार आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अंतर्गत समिती व समान संधी कक्षाने केले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.
