नवोदितांना प्रेरणा देणारा रचनात्मक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना -डॉ.मल्लिकार्जुन करजगी
नांदेड:(दि.९ जानेवारी २०२४)
राष्ट्रीय सेवा योजना विभाग म्हणजे नवोदितांचे प्रेरणास्थान आहे. राष्ट्र विकास करणारी ही चळवळ महिलांमध्ये प्रसारित होणे गरजेचे आहे. तरुण आणि तरुणींनी स्वयंस्फूर्तपणे राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होऊन संवेदनशीलतेने समाजविकासात आपली भूमिका पार पाडल्यास राष्ट्र विकास निश्चित होईल. महाराष्ट्रात नांदेड जिल्हा समाजाला उपयोगी ठरेल; असे मूल्य व सेवा देणारा जिल्हा आहे. पायी चालताना उजव्या हाताने चाला, ही नांदेडने समग्र महाराष्ट्राला दिलेली एक अनोखी देणगी आहे तसेच नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा. स्वच्छ भारतासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत आणि जल जागृती करावी, असे विचार डॉ.मल्लिकार्जुन करजगी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिर उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या करीता युवक शिबीर दि.०७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत मौजे मरळक, ता.जि. नांदेड येथे संपन्न होत आहे. याप्रसंगी ते दि.८ जानेवारी रोजी बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष मरळक गावच्या सरपंच श्रीमती श्रीमंताबाई नारायण पोहरे, प्रमुख उद्घाटक संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमतचे प्रमुख व्याख्याते प्रो.डॉ.तोळमारे एस. एस., मरळक गावचे उपसरपंच बालाजी नामदेवराव कदम, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गंगाधरराव धोंडजी कदम,
राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी भोसले, डॉ.दिगंबर भोसले,डॉ.मीरा फड, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड, डॉ.कैलास इंगोले, प्रा. राजरत्न सोनटक्के,प्रा.राजश्री जी.भोपाळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिराचे उद्घाटन यशस्वीरित्या संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.बालाजी भोसले यांनी तर सूत्रसंचालन डॉ.दिगंबर भोसले यांनी केले. शेवटी आभार प्रा.अभिनंदन इंगोले यांनी मानले.