एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला :”काटकसर”:लैलेशा भुरे
*काटकसर*
अलिकडच्या पिढीला काटकसर काय असते ते माहितच नसते.हल्ली मुलांनी काही मागितलं की लगेच ती वस्तू मुलांना घेऊन दिली जाते.याला त्यांचे पालकच जबाबदार असतात.पूर्वी असं नसायचं… पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती.घरातील कर्त्या पुरुषाला सर्व कुटुंब सांभाळावे लागे.मुलांनाही आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण होती.शंभर वेळा हट्ट केला की मग कुठे एकदा हट्ट पुरविला जायचा.त्यातही घरातील तुझ्यापेक्षा छोट्या भावंडांना देखील खेळू दे बरं का तुझं खेळणं,अशी प्रेमळ ताकिदही दिली जायची.पण आता विभक्त
कुटुंब पद्धती आहे.त्यातही हल्ली एक किंवा दोनच मुले असतात.त्यामुळे पालक त्यांचे नको ते हट्ट बरेचदा पुरवित असतात.
काटकसर हा विषय अनेक अंगाने विचार केला तर आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही वस्तू आवश्यक असतातच, पण बरेचदा आपण गरजेपेक्षा जास्त आणि गरज नसताना सुद्धा वस्तू खरेदी करतच राहतो.हल्ली मोबाईल तर स्टेटस सिम्बॉल झाला आहे.अगदी लहान मुले सुध्दा मोबाईल घेऊन त्यावर गेम खेळत बसतात.समाजात मानसन्मान वाढविण्यासाठी लोक चारचाकी वाहने खरेदी करतात.काहींजवळ तर एक पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने असतात.पैसा आहे म्हणून उगाचच त्याचा अपव्यय करत बसणे ही उधळपट्टी नाही तर काय आहे? म्हणूनच पैशाचा योग्य विनियोग करणे गरजेचे आहे.हा वाचवलेला पैसाच भविष्यात आपल्या कामाला येतो.काही प्रमाणात का होईना इतरांना देखील त्याचा फायदा होऊन आपल्या हातून समाजसेवाही घडेल.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर