एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “शब्द”:लैलेशा भुरे
शब्द
अक्षरांच्या एकत्र येण्याला आपण शब्द म्हणतो का?नाही.अक्षरे एकत्र आल्यानंतर त्यातून काही ना काही अर्थ ज्यावेळी अभिप्रेत होतो तो शब्द म्हणुन ओळखला जातो.’शब्द’ हा शब्द जरी बोलण्यास आणि लिहिण्यास सोपा असला तरी त्याची ताकद फार मोठी आहे.शब्दांचे वजन हे व्यक्ती परत्वे बदलत असते.शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.पण त्याची धार ही बोलणा-याच्या वागण्यावर अवलंबून असते.पूर्वीच्या काळी ऋषी मुनींचे आशिर्वाद आणि शाप दोन्ही परिणामकारक असायचे.आज शब्दांची ताकद संपली आहे.कारण दिल्या शब्दाला जागण आपण विसरलो.शिवाजी महाराजांनी मुघलांना टक्कर देत हिंदवी स्वराज्य स्थापन केले.त्यामागे त्यांचा पराक्रम तर होताच,पण त्याचबरोबर त्यांच्या एका शब्दावर जीव देणारी माणसं त्यांच्याजवळ होती.त्या शब्दांची ताकद तितकी मोठी होती.
आपल्या तोंडातून निघणा-या शब्दांना ताकद प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आपल्यातच असतं.ते कुणी दुसरं निर्माण करू शकत नाही.शस्त्राचे घाव भरले जातात पण शब्दांचे घाव भरले जात नाहीत.काळाच्या ओघात ते पुन्हा कधीना कधी आठवण करून देतातच.पण हेही खरे आहे की, शब्दांच्या घावावर शब्दांचाच मलम उपयोगी पडतो.
शब्दांचं सामर्थ्य आपण डावलू शकत नाही.शब्द हे अर्जुनाच्या न संपणा-या बाणांच्या भात्यासारखे असले तरी त्यांचा कसाही वापर करणे योग्य नाही.आपल्या शब्दांची मर्यादा आपणच ठेवणे गरजेचे आहे.त्यामुळे त्यांचे पावित्र्य आणि ताकद आपोआपच राखली जाईल.शब्दांचे आपल्यावर खूप उपकार आहेत.त्यांच्याविना जीवन संभव नाही.शब्दांची ताकदच माणसाला त्याच्या वैयक्तिक जीवनात खूप उंचीवर घेऊन जाते.म्हणूनच शब्दांचा वापर खूप काळजीपूर्वक करावा.
**************************
लैलेशा भुरे
नागपुर