नांदेड : यशवंत महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी नांदेड शहर वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे पत्राद्वारे वाहतूक नियमनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महाविद्यालयाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या पत्रानुसार, महाविद्यालयात जवळपास ८,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने निदर्शनास आणून दिले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता महाविद्यालयाच्या गेटसमोरील रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती प्राचार्यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने महाविद्यालय सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती, वाहनांना शिस्त लावणे तसेच अनधिकृतपणे रस्त्यावर उभी राहणारी वाहने हटविणे यासारख्या उपाययोजना केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
