(नांदेड, प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या अधिकृत मुखपत्र “विचार मंथन” या प्रतिष्ठित संशोधनाभिमुख नियतकालिकाच्या संपादकपदी पीपल्स कॉलेज, नांदेड येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी असून, परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद ही राज्यातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयातील अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे. परिषदेचे अधिकृत मुखपत्र “विचार मंथन” हे राज्यशास्त्र, लोकप्रशासन, सार्वजनिक धोरण, शासनव्यवस्था, लोकशाही, सामाजिक परिवर्तन तसेच समकालीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरील संशोधनपर लेख प्रकाशित करणारे महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.
प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे यांनी राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयामध्ये सातत्यपूर्ण अध्यापन, संशोधन, लेखन, संपादन आणि शैक्षणिक नेतृत्वाद्वारे उल्लेखनीय योगदान दिले आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधनपर शोधनिबंध सादर केले असून त्यांचे साधना, समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत, परिवर्तनाचा वाटसरू, विचारशलाका इत्यादी वैचारिक नियतकालिकात विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक विषयावर जवळपास ८० पेक्षा अधिक लेख प्रकाशित आहेत. विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक यांच्यामध्ये अभ्यासू, संशोधनाभिमुख व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे “विचार मंथन” या नियतकालिकाला नवी वैचारिक दिशा, संशोधनाची गुणवत्ता, व्यापक शैक्षणिक सहभाग आणि समकालीन विषयांवरील चिकित्सक विचारांना चालना मिळेल, असा विश्वास राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे.
प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे यांच्या या मानाच्या नियुक्तीबद्दल नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सी.ए. डॉ. प्रवीण पाटील, सचिव प्राध्यापक सौ शामल पत्की, प्राचार्य डॉ. विकास सुकाळे व इतर राज्यशास्त्र व लोकप्रशासन क्षेत्रातील अनेक प्राध्यापक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध महाविद्यालयांतील शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
