वारी पर्यावरणाची… वृक्षारोपणाची!’ उपक्रमातून अध्यात्म, संतवाणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश
दिनांक २८ जुलै रोजी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात वारी पर्यावरणाची… वृक्षारोपणाची! हा पर्यावरण संवर्धन व संतांचा मानवतेचा उपदेश कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ह भ प सुशील महाराज वणवे यांनी विद्यार्थिनींना पर्यावरण संरक्षणाचे महत्व पटवून देत संतांच्या उपदेशाचे पालन करत राष्ट्रविकासाला हातभार लावण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण प्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते, असे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी सांगितले.
विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. संतांच्या निसर्गप्रेमाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकार करत या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सुप्रसिद्ध कवन रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम याने झाली, या प्रसंगी श्री गुरुदेव सेवाश्रम शेगाव व संत गजानन महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पालखी चे संचालक ह भ प सुशील महाराज वणवे व सहकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, संगीत विभाग प्रमुख डॉ. रवींद्र इंगळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. संगीता अवचार, प्रा, निर्मला जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश जाधव, संगीता लोमटे, डॉ. पल्लवी कुलकर्णी, डॉ. ओमप्रभा लोहकरे, डॉ. गणेश जाधव, प्रा. निकिता कुलकर्णी, मुख्य लिपिक श्री. वैजनाथ गाडगे व प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
