*
नांदेड:( दि. ७ मे २०२६)
एकविसाव्या शतकातील मानवास ध्यानाची नितांत आवश्यकता आहे. आज अनावश्यक व्यस्तता, महत्वाकांक्षा, न पूर्ण होणाऱ्या अपेक्षा, प्रतीक्षेचा आणि संयमाचा अभाव, दुर्लक्ष करण्यासारख्या क्षुल्लक बाबीला महत्त्व, क्रोध ही मानवाची सर्वसामान्य वैशिष्ट्ये झालेली आहे. अशा परिस्थितीत दररोज ध्यानधारणा करणे; हा सर्व समस्यांवर उपाय आहे. ध्यान हा समृद्धीचा सर्वोच्च अनुभव असल्याचे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख व नियमित ध्यान साधक डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
भगवान रजनीश ब्लेसिंग मेडिटेशन कम्युन, निळा रोड, तुलसी पेंट्सच्या जवळ, नांदेड येथे दर रविवारी संपन्न होणाऱ्या सक्रिय ध्यान समारोपप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा.महेंद्र देशमुख, उमरी, लक्ष्मीकांत वानखेडे, डॉ.रवींद्र देशमुख, राम गाडे पाटील, संजय बोबडे शिवाजी देशमुख आदी साधकांची उपस्थिती होती. ओशो रजनीश यांनी आधुनिक मानवाच्या समस्येवरील उपाययोजना म्हणून सक्रिय ध्यानाची निर्मिती केली. दर रविवारी सकाळी सात वाजता सक्रिय ध्यान पद्धतीचा असंख्य साधक लाभ घेत आहेत आणि जीवनात परिवर्तन अनुभवत आहेत.
ओशो रजनीश यांच्या हस्ते पन्नास वर्षांपूर्वी संन्यासीत स्वामी गोपाल भारती, स्वामी प्रशांत, मा सुगंधा यांनी या ध्यान केंद्राची २०१५ मध्ये निर्मिती केली असून देश विदेशातील विविध शिबिर संचालकांनी साधकांना मार्गदर्शन केलेले आहे. एक दिवशीय, तीन दिवसीय अशा विविध ध्यान शिबिरांमुळे नांदेडमध्ये ध्यान साधकांना साधनेकरिता चांगले ध्यान केंद्र उपलब्ध आहे.
