नांदेड | (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी २०२६ पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरळीतपणे सुरू असून, परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली.
यंदा प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत परीक्षा घेतल्या जात असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार तसेच प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. भट्टुप्रसाद पाटील यांच्या देखरेखीखाली परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयासह नांदेड विभागीय केंद्रात मुख्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील संशयास्पद हालचाली, प्रश्नपत्रिका डाउनलोड प्रक्रिया तसेच उत्तरपत्रिकांच्या सीलिंग प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नांदेड विभागीय केंद्रांतर्गत नांदेड, हिंगोली, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांतील ८७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू असून, एकूण ८० हजार ४२० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी ८७ बहिस्थ पर्यवेक्षक (बैठे पथक) नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ११ दक्षता पथकांमध्ये ३८ अनुभवी प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला असून परीक्षा प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
एआय आधारित सीसीटीव्ही निगराणी, दक्षता पथकांची सतर्क देखरेख आणि कडक शिस्तीच्या वातावरणामुळे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा यशस्वीपणे व सुरळीतपणे पार पडत असल्याचे डॉ. कलेपवार यांनी सांगितले.
चौकट
सीसीटीव्ही निगराणीत परीक्षा घेणारे राज्यातील पहिले विद्यापीठ
यंदाच्या परीक्षा प्रक्रियेत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित सीसीटीव्ही प्रणालीचा वापर करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. देशातील विविध स्पर्धा व महत्त्वाच्या परीक्षांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी पारंपरिक विद्यापीठीय परीक्षा एआय सीसीटीव्हीच्या निगराणीत घेणारे हे महाराष्ट्र राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरळीत
या प्रणालीमुळे परीक्षेतील कॉपी, गैरप्रकार आणि शिस्तभंगाच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला असून, परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या या अभिनव निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.
