—————————————
उदगीर:-महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्री-पुरुष असमानता यासाठी सतत लढा दिला त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज परिवर्तनासाठी समर्पित केले. 01 जानेवारी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती घडवून आणली. येथील प्रस्थापित ब्राह्मणवाद व अन्यायकारक परंपराचा त्यांनी कायम विरोध केला. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे शस्त्र आहे त्यामुळे सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार असला पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. शिक्षणातून अंधश्रद्धा दूर होईल असा ठाम विश्वास महान क्रांतिकारक समाज सुधारक म.ज्योतिबा फुले यांना होता असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी केले
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज,स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिग, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व स्वामी विवेकानंद महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले यांची 199 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संजय हट्टे, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा.अमर तांदळे, संगणकशास्त्र विभागाचे प्रभारी राशेद दायमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प्रा.पुंडगे म्हणाले की, म.फुले यांनी जातिभेद नष्ट करणे, समानता निर्माण करणे, सर्वांना शिक्षण मिळणे, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची 1873 रोजी स्थापना केली.त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख,त्यांच्यावर होणारा अन्याय हा शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून मांडला.त्यांनी प्रस्थापित धर्म व्यवस्थेचा देखील विरोध केला. येथील वर्णव्यवस्था ही शूद्र समाजाला कायम गुलामगिरीत अडकून ठेवत आहे हे षडयंत्र त्यांनी ओळखले होते त्यामुळे त्यांनी या समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी खऱ्या धर्माचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक सत्य धर्माची संकल्पना मांडली. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अमर तांदळे यांनी मानले. यावेळी स्वामी विवेकानंद संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल भाटकुळें, संदेश गवळे, वैभव बिडवे, प्रदीप पाटील, बालाजी कदम यांनी परिश्रम घेतले.
