नांदेड (प्रतिनिधी):
नांदेड शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून रस्त्यांवरील वेगवान वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये, वस्ती परिसर आणि प्रमुख चौकांच्या ठिकाणी वाहने वेगाने धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही शेतकरी पुतळा ते गुरुजी चौक या रस्त्यावर गेल्या वर्षभरामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गुरुजी चौक परिसरात मागील दोन महिन्यापूर्वी एका शिक्षकाचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे छत्रपती चौक ते मोर चौक अनेक खाजगी शाळा असून येथे सुद्धा या रस्त्यांवर वाहने अतिवेगाने धावत असल्याने अनेकदा किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थी रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वस्ती भागात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्ता ओलांडताना धोका निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून तेथे तातडीने गतिरोधक बसवावेत. तसेच वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त घालून वेगमर्यादेचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवावे.
वाहतूक तज्ञांच्या मते, योग्य ठिकाणी गतिरोधक बसविणे, दिशादर्शक फलक लावणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली असून शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे.
