किनवट तालुका प्रतिनिधी –
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी येथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये बालमित्र मेळावा संमेलन उत्साहात पार पडले. तब्बल 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावनिक क्षणांचे चित्र पाहायला मिळाले.
या अनोख्या मेळाव्याचे आयोजन रवींद्र जंगलेवाड, बादल राठोड, लकी राठोड आणि अंकुश राठोड यांनी पुढाकार घेऊन केले. 2003 सालच्या दहावीच्या जुन्या बॅचमधील मित्रांना पुन्हा एकत्र आणण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता. अनेक वर्षांनंतर भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि वातावरण आनंदमय झाले.
कार्यक्रमादरम्यान दिलीप श्रीनिवार यांनी “आने से उसकी आये बहार” हे गाणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले व कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जंगलेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केले.
मांडवी नगरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या बालमित्र मेळाव्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, आयोजकांच्या प्रयत्नांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
