*
*नाट्य व गीतांच्या या कार्यक्रमाचा नांदेडकरांनी लाभ घ्यावा – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार*
नांदेड -दि.१२ मार्च :- श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात ‘हिंद-दी -चादर’ या नाट्य व गीतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राज्यात आठ ठिकाणी करण्यात आलेले आहे. १४ मार्च २०२६, रोजी सायंकाळी ६:३० वा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
नाट्यमय प्रसंग आणि गीत रचना अशा कलाविष्कारांनी युक्त 60 कलावंतांनी साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा आहे. या ‘हिंद दी चादर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे राज्यात वाशी, मिरा रोड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या केवळ आठ ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे.
‘हिंद-दी -चादर’ श्रीगुरु तेग बहादुर जी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यांचे जीवनकार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. म्हणूनच श्रीगुरू तेग बहादूर यांच्या शहिदीच्या ३५०व्या वर्षपूर्तीनिमित्त नागपूर, नांदेड आणि नवी मुंबई येथे भव्य स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगुरू तेग बहादूर यांच्या बलिदानाची आठवण ठेवणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे तसेच समाजात एकता, बंधुता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे असा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश. जो विविध धर्म, संप्रदाय व समाजघटकांना एकत्र आणणारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.
हा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभाग संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
