नांदेड:
महादेव पिंपळगाव येथे आयोजित बांधकाम कामगारांसाठीच्या अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये व्यवस्थापनाच्या अभावामुळे कामगारांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. किट घेण्यासाठी आलेल्या कामगारांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून नंबर लावण्याची कोणतीही स्पष्ट व्यवस्था नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कॅम्प परिसरात गर्दीचे प्रमाण मोठे असून सावली, पिण्याच्या पाण्याची तसेच बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने महिला, वृद्ध व दिव्यांग कामगारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर कष्टाची कामे करून आलेल्या मजुरांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
काही कामगारांनी तक्रार केली की, ओळखीच्या व्यक्तींची कामे आधी करून देण्यात येत असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. योग्य नियोजन व नियंत्रण नसल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे.
दरम्यान, कामगारांनी प्रशासनाकडे टोकन पद्धती लागू करणे, रांग व्यवस्थापन सुधारणे, सावली व पाण्याची व्यवस्था करणे तसेच वितरण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, अशी मागणी केली आहे. कामगारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
