—————————————
उदगीर :- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करता येते. आपल्या देशाबद्दल, नागरिकाबद्दल आपुलकी, प्रेम भावना निर्माण होते. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे सामजिक कार्य करणे हा असतो. या कार्यातून सामाजिक हीत जोपासले जाते त्याच बरोबर एक जबाबदार आणि चारित्र्य संपन्न नागरिक घडविण्याचे कार्य देखिल केले जाते तसेच महाविद्यालयाचा परिसर, आपल्या शहराचा, नगराचा परिसर स्वच्छ करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, प्रथमोचार सबंधी महिती, नागरिक संरक्षण, पर्यावरण संवर्धन इ.कार्यक्रमाचा समावेश राष्ट्रीय सेवा योजनेत असतो. या सर्व उपक्रमातून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो.असे प्रतिपादन देवर्जन गटातील जिल्हा परिषद सदस्य प्रा.दिलीपकुमार मटके यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाचे वार्षिक विशेष शिबिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दि.22/02/2026 ते 28/02/2026 या दरम्यान देवर्जन (हत्तीबेट) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रा.दिलीपकुमार मटके बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर,पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कांबळे, ग्रामविकास अधिकारी भीमराव महाडोळे, दै.लोकमतचे प्रतिनिधी व्हि.एस.कुलकर्णी,पत्रकारिता व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, रासेयो विभागाचे प्रमुख प्रा. अमर तांदळे, प्रा. रोहिणी वाघमारे, सुग्रीव सूर्यवंशी, अरविंद गिलचे, तुकाराम रायपल्ले, रासेयोचे प्रतिनिधी रामेश्वर पळनाटे, अपर्णा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प्रा.दिलीपकुमार मटके म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील परिसराची स्वच्छता, सुधारणा, आरोग्य, कुटुंब नियोजन, सामाजिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या लोकांची कामे करण्यावर भर देण्यात येते. यातून युवा शक्ती देश घडविण्यात किती महत्वपूर्ण योगदान देते हे आपणास दिसून येते असे ते म्हणाले.
या कार्यक्रमांच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. शेषनारायण जाधव म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांना आपल्या कला गुणांना सादर करण्याची संधी मिळते. आपल्या आजू बाजूला जो परिसर आहे त्यांची माहिती मिळते तेथे सेवा करण्याची संधी मिळते.पर्यावरण संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, वृक्ष लागवड आदी कार्य समाज हितासाठी केले जाते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, समाज सेवा ही मूल्ये रुजतात.असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हि.एस.कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. राहुल पुंडगे व आभार प्रा. अमर तांदळे यांनी मानले. यावेळी शिबिरात सहभागी रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
