https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी* *आदर्श आचारसंहिता,कायदा सुव्यवस्था, संदर्भात सक्त सूचना जारी* *माध्यमातील पेड न्यूज, अफवा, समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर करडी नजर

*लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी*

*आदर्श आचारसंहिता,कायदा सुव्यवस्था, संदर्भात सक्त सूचना जारी*

*माध्यमातील पेड न्यूज, अफवा, समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर करडी नजर

नांदेड दि. ६ : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलेले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी गेल्या दोन दिवसात विविध बैठका घेऊन निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था आणि माध्यमांचा गैरवापर याकडे विशेष लक्ष वेधले आहे. याबाबत कुठलीही हयगय सहन केली जाणार नाही, असे सक्त आदेश त्यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला दिले आहेत.
नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये या संदर्भात दोन दिवसात तीन बैठकी घेण्यात आल्यात. यामध्ये विभाग व विविध कक्ष प्रमुखांची प्रामुख्याने बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण व निर्धारित कर्तव्याची माहिती दिली गेली.
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशिक्षण व व्यवस्थापन कक्ष,आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था निवडणूक विषयक वेबसाईट तयार करणे, माहिती व व्यवस्थापन कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष, ईव्हीएम कक्ष, निवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण कक्ष,टपाली मतपत्रिका कक्ष मतदार यादी कक्ष, संगणक, सायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान कक्ष, वाहतूक व संपर्क व्यवस्था कक्ष, मतपत्रिका छपाई व वाटप कक्ष, सीव्हीजील पब्लिक हेल्पलाइन, उमेदवार राजकीय पक्ष निवडणूक खर्च विभाग, मीडिया कक्ष ( माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती ) निवडणूक निरीक्षक कक्ष, मतमोजणी कक्ष, मतदार जनजागृती अभियान कक्ष, निवडणूक कायदेविषयक कक्ष, मतदान केंद्रावरील सुरक्षा व सुविधा कक्ष, अशा विविध समित्यांची स्थापना जिल्हास्तरावर करण्यात आली आहे.

या सर्व समित्यांचे कर्तव्य, घ्यायची दक्षता, कार्यपद्धत, काल मर्यादा, अधिकार आणि व्याप्ती याबाबतचे प्रशिक्षण या काळामध्ये देण्यात आले. विशेषतः आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होता कामा नये, याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

निवडणूक काळामध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्याचे काम काही गुन्हेगारी तत्वांकडून केले जाते. अनेक ठिकाणी निवडणूक यंत्रणा, ईव्हीएम मशीन मतपत्रिका कायदा सुव्यवस्था, यंत्रणाबद्दलची सुविधा या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरविल्या जातात. समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो मात्र, असा चुकीचा प्रसार मोडून काढण्याचे सूचना व असे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश, त्या संदर्भातील तरतुदी याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील सायबर सेल या संदर्भात अधिक दक्ष असून याबाबतीत तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता प्रत्येक यंत्रणेने तयार करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. माध्यमातील वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. आचार संहिता जारी झाल्यानंतर या संदर्भातील काटेकोर पालन करण्याबाबत सूचना प्रामुख्याने यावेळी देण्यात आल्या.

संविधानाच्या कलम 324 अनुसार भारत निवडणूक आयोगाकडे कोणत्याही कर्मचाऱ्यांची कुठेही सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे. यंत्रणेतील अधिकारी हे निवडणूक आयोगाच्या वतीने काम करत असतात. त्यामुळे अतिशय गांभीर्याने निवडणूक कार्याला घेण्याचे त्यांनी सूचित केले .त्यामुळे एकदा नियुक्त करण्यात आल्यानंतर निवडणूक कर्तव्यात बदल करण्यासाठी कोणी प्रयत्न करू नये, ड्युटी चार्ज बदलून मागू नये,अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी या काळात आपले सर्वोत्तम प्रयत्न प्रक्रियेत देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704