नांदेड :
पर्यावरणाचा ऱ्हास ही आजची गंभीर समस्या असून पर्यावरण रक्षणासाठी केवळ धोरणे पुरेशी नसून जनजागृती आणि युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन एमजीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालिका डॉ. गीता लाठकर यांनी केले. नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व रांगोळी स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.पर्यावरण समस्या, संवर्धन आणि समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब पांडे यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. गीता लाठकर यांनी वाढते प्रदूषण, हवामान बदल, पाणीटंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास या विषयांवर सखोल प्रकाश टाकला. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासकीय यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. फड यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. जे. शिंदे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी कायदे, नियम आणि नागरिकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘पर्यावरण व विकसित भारत’ हा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण आणि देशाच्या शाश्वत विकासाचा परस्पर संबंध प्रभावी शब्दांत मांडला. रांगोळी स्पर्धेमध्ये ‘भारतीय सण आणि पर्यावरण’ या विषयावर आधारित रांगोळ्यांतून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश देण्यात आला.या दोन्ही स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेतून आणि विचारांतून पर्यावरण रक्षणाबाबतची जागरूकता प्रकर्षाने दिसून आली. विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले.युवा पिढीमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन आणि आयोजन यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. संपूर्ण कार्यक्रम नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला डॉक्टर एस बी फड प्राचार्य नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय, एस जे शिंदे उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ डॉ. के एम कदम उपप्राचार्य नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय प्राध्यापक दिपाली जाधव समन्वयक डॉक्टर डॉ.ए.आर.आष्टुस्कर पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख, डॉ अर्चना भवनकर उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक जान्हवी शिऊरकर प्राध्यापक राजेश उंबरकर प्राध्यापक किरण वाघमारे आदींची उपस्थिती होती
