नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘तिरंगा रॅली’चे उत्साहात आयोजन करण्यात आले. देशभक्तीपर घोषणांनी आणि तिरंग्याच्या अभिमानाने विद्यापीठ परिसर भारावून गेला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर जी. चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदींची उपस्थित होती.
रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारुती गायकवाड यांच्या संयोजनातून तसेच विद्यापीठ परिसर कार्यक्रमाधिकारी डॉ. नंदकुमार बोधगिरे यांच्या सहकार्याने रॅली यशस्वीपणे पार पडली.
तिरंगा रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी विद्यापीठ परिसर दुमदुमून टाकला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
———————-
